Blog Details
अखंड भारत
Dr. Sharad Kunte
राष्ट्रांच्या सीमा या त्या देशातील युवकांच्या मनगटात किती ताकद आहे यावर ठरत असतात. भारत परतंत्र होता, भारतीय समाज दुबळा होता,त्यावेळी एका अखंड विराट हिंदुस्थानचे अनेक तुकडे होत गेले. क्रमाक्रमाने तिबेट, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, श्रीलंका व ब्रह्मदेश हे भारतापासून वेगळे करण्यात आले. १९४७ साली तर भारताला स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली भारताची इंग्रजांनी रीतसर फाळणी घडवून आणली व पाकिस्तान नावाचे एक नवीन राष्ट्र येथे जन्माला घातले. यातल्या कोणत्याही विभाजनास भारतीय समाज प्रतिकार करू शकला नाही, कारण प्रतिकार करण्याची शक्तीच या समाजात नव्हती.
पण त्याहून दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपला देश पुन्हा एकदा अखंड झाला पाहिजे, तो समर्थ आणि संपन्न झाला पाहिजे, अशी ईर्षा इथल्या युवकांच्या मनामधून हळूहळू अस्पष्ट होत चाललेली आहे. इतिहासात इंग्रजांनी जे घडवले ते घडले. आता परत पूर्वीच्या स्थितीकडे कशाला जायचे? अशीच एक पराभूत मानसिकता येथील युवकांच्या मनात आहे.जोपर्यंत अशी पराभूत मानसिकता आमच्या युवकांच्या मनात आहे, तोपर्यंत अखंड भारत वास्तवात येणे हे अशक्यच आहे.
या देशातील काही विद्वान वेगळाच तर्क मांडतात. त्यांचे असे प्रतिपादन असते की भारताची फाळणी करून इंग्रजांनी भारतावर उपकारच केलेले आहेत. मुस्लिम समाजाची लोकसंख्या या देशात एवढ्या वेगाने वाढत चाललेली आहे की भारताची त्यावेळी जर फाळणी केली नसती तर संपूर्ण भारतच मुस्लिम बहुसंख्येमुळे पाकिस्तान होऊन गेला असता. डॉक्टर आंबेडकरांनी सुचवलेली लोकसंख्येची अदलाबदल फाळणीच्या वेळी घडू शकली नाही. त्यामुळे उर्वरित भारतात जो मुसलमान समाज होता, तो इथे तसाच राहिला व त्यांच्या मनातली पाकिस्तान निर्मितीची उर्मी ही तशीच राहिली. त्याचाच परिणाम भारतामध्ये पुढची ७० वर्षे सातत्याने जातीय दंगली होण्यामध्ये घडून आला. फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम क्षेत्रामध्ये हिंदूंचा जो भयानक नरसंहार घडून आला, त्याच्याकडे बोट दाखवून आपल्या इथले विचारवंत असे म्हणतात की जर इंग्रजांनी या देशाची फाळणी केली नसती तर संपूर्ण देशातच अशा प्रकारचा नरहसंहार मुस्लिम गुंडांनी घडवला असता व कदाचित भारतातून पूर्णपणे हिंदूच नामशेष होऊन गेले असते. ज्यांची मानसिकताच इतकी नकारात्मक आहे, त्यांच्या मनात अखंड भारताचा विचार येणेही अशक्य आहे किंवा अखंड भारतासाठी काही प्रयत्नांची जोड त्यांच्याकडून मिळणे हेही अशक्य आहे.
परंतु भारतातील विजिगीषू युवकांची संख्या अगदीच काही नगण्य नाही. फाळणीच्या आधीपासूनच ह्या देशाला अखंड ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते करत होते. त्यांना ज्यावेळी फाळणी टाळणे शक्य झाले नाही, त्यावेळी पाकिस्तानच्या दंगलग्रस्त भागातून कोट्यावधी हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी त्यांनी पाकिस्तानी पोलीस, लष्कर व गुंड यांच्याशी सशस्त्र संघर्ष देखील केला. फार मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज भारतात परत येऊ शकला तो या पराक्रमी युवकांच्या कार्यामुळे, व या कार्यात त्यांनी केलेल्या बलिदानामुळे. परंतु हा पराक्रम भारताची फाळणी रोखण्यास असमर्थ ठरला. अखंड भारत टिकवून ठेवणे त्यांच्या ताकदी पलीकडची गोष्ट होती. असे जरी घडले तरी देखील हा देश पुन्हा अखंड ठेवण्यासाठी या युवकांच्या मनामध्ये एक जाज्वल्य देशभक्तीची भावना सदैव दैवत राहिलेली आहे. प्रत्येक वर्षी १४ ऑगस्ट रोजी रात्री अखंड भारताचे जाहीर स्मरण करून ते आपला देश पुन्हा अखंड करण्याची प्रतिज्ञा घेत असतात. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अखंड भारताची आठवण करून दिली व १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीतील नरसंहाराचे स्मरण म्हणून साजरा करावा असे जनतेला आवाहन केले. त्यांच्या मनातही अखंड भारतापेक्षा वेगळी कल्पना निश्चितच नाही. आज तरी देशातील सामान्य जनता असो की केंद्रामध्ये असलेले व सत्तास्थानांवर पोहोचलेले राष्ट्रभक्त नेते असोत , अखंड भारत हे एक स्वप्न राहिलेले आहे. ते वास्तवात कसे येईल यासाठी निश्चितच सखोल चिंतन व कठोर परिश्रमांची आवश्यकता आहे.
अखंड भारताच्या निर्मितीसाठी यापूर्वीही संधी मिळालेली होती
भारत अखंड करण्यासाठी आपण आपले सैन्य घेऊन आक्रमण करावे व पाकिस्तानचे तुकडे उडवावेत किंवा त्याचा मोठा भूभाग मुक्त करावा अशा वल्गना करणारे लोक आजही देशात सापडतात. परंतु हे इतक्या सहजासहजी घडून येणे शक्य नाही हे आजच्या युक्रेन रशिया युद्धावरून सहजच कोणाच्याही लक्षात येईल. देशाचा एक मोठा भूभाग स्वतंत्र करण्याची एक मोठी संधी ७१ साली आपल्या राष्ट्र नेत्यांना म्हणजे इंदिराजींना प्राप्त झालेली होती. पूर्व पाकिस्तान मध्ये संपूर्ण लष्करी विजय मिळवून ९१००० पाकिस्तानी सैनिकांना आपण कैद केले होते व पूर्व बंगालवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. भारताच्या अतिसहिष्णु वृत्तीमुळे आपण तो प्रदेश आपल्या भूभागाशी मिळवून ठेवण्याचा प्रयत्न न करता बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आणले व त्या राष्ट्राला सर्व प्रकारची मदत देऊन त्याला पायावर उभे करण्याचे काम केले. त्या संधीचा फायदा घेऊन एखादे बाहुले सरकार पूर्व बंगालमध्ये अस्तित्वात आणले असते तर आज ना उद्या देशाचा पूर्व बंगालचा भाग तरी निदान भारतामध्ये विलीन करून घेता आला असता. परंतु इतिहास घडून गेलेला आहे. पुन्हा त्याच मार्गाने बांगलादेशचे भारतात विलीनीकरण करणे इतके सोपे राहिलेले नाही. पाकिस्तानचे आपल्या ताब्यात असलेले सैन्य पाकिस्तानला परत करण्यापूर्वी निदान पाकिस्तानने जिंकलेला काश्मीरचा जो भूभाग आहे तो तरी मुक्त करून घेण्यासाठी भारताने दबाव आणणे आवश्यक होते. तसा दबाव आणला असता तर ४८ साली पाकिस्तानी बळकवलेले स्कार्डू व गिलगिट बाल्टिस्तान सारखे सर्व प्रदेश भारताच्या ताब्यात सहजपणे आले असते व त्यानंतर या क्षेत्रात भारतीय सैन्याला वारंवार जे संघर्ष करावे लागले ते तरी करावे लागले नसते. कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचीच कमतरता होती, म्हणून हाती आलेली ही सुवर्णसंधी आपल्या राष्ट्र नेत्यांना प्रत्यक्ष कृतीत आणता आली नाही.
पाकिस्तानवर सैनिकी विजय मिळवणे भारताला अशक्य नाही. परंतु पाश्चात्य देशांनी भारताचे तुकडे केले, त्यामागचा त्यांचा हेतूच असा होता की कोणत्याही परिस्थितीत भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून उभे राहू द्यायचे नाही. त्यामुळे भारत जर पाकिस्तानवर आक्रमण करून तो प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करेल तर चीन, अमेरिका व युरोपीय राष्ट्रे देखील भारताला त्या कामात विरोध करतील. अरब देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील, व तो प्रसंग निभावून नेणे भारताला निश्चितच कठीण जाईल. त्यामुळे सरळसोट पद्धतीने पाकिस्तानचे भारतात विलीनीकरण करून घेणे हे इतके सहज साध्य नाही. पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, भूतान, तिबेट यासारख्या भारताच्या भूमीशी पूर्वी एकरूप असलेल्या राष्ट्र समूहांना पुन्हा आपल्या देशात विलीन करून घेणे हे त्याहीपेक्षा अधिक कठीण आहे. तेथील जनतेला आपलेसे करून न घेता केवळ लष्करी बळाच्या आधारावर आपण त्या त्या देशांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्या देशातील जनतेच्या दृष्टीने भारत हे एक आक्रमक राष्ट्र ठरेल व पुढील सर्व काळ भारताला तेथील जनतेच्या विद्रोहाला तोंड देण्यातच आपली सर्व शक्ती खर्च करावी लागेल. अफगाणिस्तान सारख्या देशाला अमेरिका व रशिया या दोन्ही महासत्तांनी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे व हे दोन्ही बलाढ्य देश अफगाणिस्तान समोर पराभूत होऊन परत गेलेले आहेत. अफगाणिस्तानला आपल्या ताब्यात ठेवणे बळाच्या आधारावर यापैकी कोणत्याही देशाला शक्य झाले नाही, हा इतिहास फार काही जुना नाही. त्यामुळे केवळ बळाचा वापर करून अखंड भारताची निर्मिती होणार नाही. त्यासाठी अधिक दूरगामी अशा उपाययोजना कराव्या लागतील हे स्पष्ट आहे.
पूर्वी अखंड भारतात असलेल्या सर्व देशांचा एक महासंघ बनला पाहिजे
एकीकरणाचे प्रयत्न फक्त भारतच करतो आहे अशातला भाग नाही. व्हिएटनामने देखील आपल्या देशाची झालेली फाळणी ही फ्रान्स व अमेरिका यासारख्या बलाढ्य राष्ट्रांची टक्कर देऊन रद्द करून दाखवलेली आहे. उत्तर व दक्षिण कोरिया असे महायुद्धाच्या वेळी झालेले विभाजन पुन्हा एकदा रद्द करावे यासाठी हे दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. पूर्व व पश्चिम जर्मनी ही महायुद्धाच्या काळात झालेली फाळणी त्या दोन्ही देशातल्या जनतेने एकत्रित प्रयत्न करून मिटवून टाकली हा तर इतिहासच आहे. परंतु एखादे उदाहरण देऊन प्रश्न सुटणार नाही. एकीकरणाच्या गरजा जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रकर्षाने पुढे येत आहेत. अमेरिकेच्या व रशियाच्या वर्चस्ववादावर मात करण्यासाठी युरोपातील सर्व देश एकत्र आले व त्यांनी युरोपीय महासंघाची स्थापना केली. आज हे संघटन एवढे एकजिनसी बनले आहे की त्या देशांमध्ये युरो हे एकच चलन सक्रिय आहे. त्या देशांमधून व्हिसा पद्धत रद्द झालेली आहे, कोणत्याही एका देशातून दुसऱ्या देशात विनापरवाना कोणालाही प्रवास करता येतो. कुठल्याही देशाचा नागरिक अन्य कोणत्याही देशांमध्ये निवास करू शकतो, उद्योग व्यवसाय करू शकतो, शिक्षण व नोकरीसाठी जाऊ शकतो. त्याच्यावर कोणतीही बंधने नाहीत. अशा प्रकारे एकजिनसी राष्ट्रसमूह तयार होणे ही आज जगातल्या प्रगत देशांची देखील एक मोठी गरज बनलेली आहे. आर्थिक, सामरिक व व्यापारी दृष्टीने जगातल्या स्पर्धेशी टिकून राहण्याकरता असा महासंघ निश्चितच उपयोगी पडू शकतो, याचा जगाने अनुभव घेतलेला आहे. भारतीय उपखंडामध्ये अशा प्रकारचा महासंघ तयार होऊ शकतो. त्या दृष्टीने ‘सार्क’ सारख्या संघटनेचा उपयोग निश्चितपणे करून घेता येईल.
सार्क संघटनेमध्ये एकजिनसीपणा येऊ शकला नाही याचे कारण पाकिस्तानचे भारताशी सतत चाललेले शीत युद्ध, त्याच्या दहशतवादी कारवाया व प्रत्येक व्यासपीठावर विविध प्रकारे खुस्पटे काढून भारताची बदनामी करण्याचे त्यांचे षडयंत्र. हे जर घडले नसते तर भारतीय उपखंडातील देशांचा महासंघ पुष्कळ आधी बनू शकला असता. त्या दृष्टीने काही प्रयत्न भारताचे राष्ट्रनेते आजही करत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी प्रथम सार्क देशातील सर्व राष्ट्र प्रमुखांना शपथविधीसाठी बोलवले ही त्या सर्व प्रकल्पाची सुरुवात होती. त्याचवेळी ‘नेबर्स फर्स्ट’ हे आपले परराष्ट्र व व्यापारी धोरण भारताने जाहीर केले होते. त्यानंतर भारताने या सार्क देशातील सर्व जनतेला योग्य पद्धतीने परस्पर संपर्क व संवाद करता यावा यासाठी एक स्वतंत्र उपग्रह उपलब्ध करून दिला. या देशांमध्ये दळण वळणाच्या सोयी वाढाव्यात यासाठी रस्ते व रेल्वे बांधणी उद्योगाला भारताने प्राधान्य दिले. अन्नधान्य निर्यात करताना सार्क देशांना प्राधान्याने अन्नपुरवठा केला पाहिजे हा भारताचा आग्रहाचा विषय राहिला. आसाम मधील भारताचे स्वनिर्मित खनिज तेल प्रसंगी तोटा सोसून देखील भारताने स्वतः पाईपलाईन उभारून बांगलादेशला दिले. गेल्या काही दिवसात श्रीलंका व नेपाळ यांच्यावर आर्थिक दृष्ट्या दिवाळखोर होण्याची वेळ आलेली असताना त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी भारतच पुढे आला, हे स्वाभाविक आहे. कारण भारतीय उपखंडातील सर्वांना आधार ठरू शकतो असा देश भारत हाच आहे. त्यामुळे भारताच्या मदतीकडे हे सर्व देश अपेक्षेने पहात असतात. चीन पासून या सर्व देशांना आक्रमणाची सतत भीती आहे. या आक्रमणापासून आपले रक्षण करू शकेल असा भारत हाच एक देश आहे, याचीही सार्क मधील सर्व सदस्य राष्ट्रांना कल्पना आहे. त्यामुळे या सर्व देशांना आर्थिक, व्यापारी व सामरिक स्वरूपाचा आधार देण्याचे कार्य जे भारत आज योजनापूर्वक करतो आहे, हेच कार्य एका महासंघाच्या निर्मितीचा पाया ठरू शकतो, यात शंका नाही.
दोन देश एकत्र येण्यासाठी त्या देशांमधील जनता मनाने एकत्र यावी लागते
अखंड भारताच्या निर्मितीस मध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा हा त्या दोन देशातील जनतेमध्ये एकमेकांविरुद्ध असलेली अविश्वासाची भावना हाच आहे. जर्मनीचे दोन भूभाग एकत्र होऊ शकले याचे कारण दोन्ही भूभागातील जनतेला एकत्र येण्याची तेवढीच तीव्र ओढ होती. अशा प्रकारची तीव्र ओढ भारत व पाकिस्तान मधील जनतेला आहे का? आज जर ती नसेल तर तशी ओढ कोणत्या आधारे निर्माण करता येईल? धर्माच्या आधारावर भारत व पाकिस्तान ही फाळणी इंग्रजांनी घडवून आणली. परंतु आज पाकिस्तान हे एक कर्जबाजारी व अपयशी राष्ट्र ठरलेले आहे. धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मिती ही टिकाऊ होऊ शकत नाही याचा पाकिस्तान हा एक चालता बोलता इतिहास आहे. जगातही इतर अनेक मुस्लिम देशांमध्ये हेच सत्य वेगवेगळ्या संघर्षांमधून पुन्हा पुन्हा जगासमोर आलेले आहे. कधीतरी हे वास्तव पाकिस्तान मधील सर्व जनतेसमोर ठामपणे मांडले जाणे आवश्यक आहे. हे मांडण्याचे काम पाकिस्तानी सरकार कधीही करणार नाही, कारण त्या सरकारचे अस्तित्वच भारत द्वेषावर अवलंबून आहे. परंतु हे काम पाकिस्तान मधील विचारवंतांना करावे लागेल. पाकिस्तानातील वृत्तपत्रांना करावे लागेल. पाकिस्तान मधून जे नागरिक जगभर पसरलेले आहेत त्यांना आपल्या देशाची जगभर होत असलेली निंदानालस्ती निश्चितच सहन होत नसेल. त्यामुळे त्याचे मूळ कारण १९४७ साली झालेल्या हिंदुस्थानच्या फाळणीतच आहे हे सत्य त्यांनीही आपल्या देशातील नागरिकांपर्यंत जाऊन मांडण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानी विचारवंतांमध्ये आपल्या जनतेसमोर सत्य मांडण्याची शक्ती आज नसेल तर ती शक्ती त्या विचारवंतांना प्राप्त करून द्यावी, यासाठी भारताला काही भूमिका बजावावी लागेल. आज पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केंद्र सत्तेविरुद्ध उद्रेक होत आहेत व ज्या ज्या ठिकाणी असे उद्रेक होत आहेत त्या त्या ठिकाणच्या जनतेचे प्रतिनिधी हेच म्हणत आहेत की आम्हाला भारतापासून वेगळे होऊन काहीही मिळाले नाही. भारतामध्ये मोदींसारखा माणूस जी प्रगती घडवून आणू शकतो, ती पाकिस्तानात आम्हाला घडवता येत नाही. त्यामुळे भारतासारखीच लोकशाही व सहिष्णू राज्यव्यवस्था आमच्या देशात निर्माण झाली पाहिजे व त्यासाठी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये असलेले व्यापारी व राजकीय संबंध पुनर्प्रस्थापित झाले पाहिजेत. हे संबंध पुनर्स्थापित होण्यासाठी पाकिस्तानला आपले दहशतवाद विस्ताराचे धोरण सोडावे लागेल व तसे करण्यासाठी पाकिस्तानी जनतेलाच सरकारवर दबाव आणावा लागेल.
पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका या सर्व देशातील जनतेला भारताशी पुन्हा एकरूप व्हावे असे केव्हा वाटेल? भारतामध्ये येथील जनतेने जर एक समर्थ, समृद्ध व समरस राष्ट्र अशी आपली प्रतिमा सिद्ध करून दाखवली, तर त्या शक्तीचे आकर्षण या भोवतालच्या सर्व देशांना निश्चितपणे वाटू शकते व त्या शक्तीशी एकरूप होण्याची स्वाभाविक प्रेरणा त्या त्या देशांमध्ये निर्माण होऊ शकते. गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियमच असा आहे की वेगवेगळ्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे पदार्थ एकत्र आले, तर मोठी गुरुत्वाकर्षण शक्ती असलेल्या वस्तूशी बाकीच्या वस्तू आपोआप येऊन घट्ट चिकटतात. जर आपण भारताशी जोडले गेलो तर भारताप्रमाणे आपल्यालाही एक समर्थ राष्ट्र म्हणून मान्यता मिळेल, जर आपण भारताशी जोडले गेलो तर भारताप्रमाणे आपल्याही देशांमध्ये आर्थिक उन्नती होऊ शकेल, जर आपण भारताशी जोडले गेलो तर भारताप्रमाणे आपल्याही देशांमध्ये वाहतुकीची उत्तम साधने निर्माण होऊ शकतील, जर आपण भारताशी जोडले गेलो तर आपल्या देशातील नागरिकांना सर्व जगभर सन्मान मिळेल, अशा प्रकारची प्रेरणा त्या त्या देशातील नागरिकांमध्ये जर निर्माण झाली तर त्यांना भारताबरोबर येऊन एक महासंघ बनवण्याची इच्छा निर्माण होईल. जनतेच्या दबावातूनच त्या त्या देशातल्या राज्यकर्त्यांना भारताच्या राज्यकर्त्यांशी संवाद साधून असा महासंघ बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. ही गोष्ट तेव्हाच शक्य आहे, ज्यावेळी भारत एक आर्थिक व लष्करी महासत्ता म्हणून पुढे येईल. आज भारत ही जगातील पाचवी आर्थिक सत्ता म्हणून प्रस्थापित झालेला आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ३.७५ लाख ट्रिलियन डॉलर एवढी आहे. पुढच्या पाच दहा वर्षात ती अर्थशक्ती १० ट्रिलियन डॉलर ची मर्यादा ओलांडून जाऊ शकेल. असे ज्यावेळी घडेल त्यावेळी निश्चितपणे भारताच्या सामर्थ्य व समृद्धीकडे भोवतालच्या सर्व देशातील नागरिक हे आकर्षित होतील व भारतीय उपखंडात एक महासंघ बनविण्याची प्रक्रिया वेग घेईल.
भारतीय महासंघ ज्यावेळी अस्तित्वात येईल त्यावेळी त्या त्या देशांमध्ये स्वतंत्र शासन व्यवस्था अस्तित्वात असेल व तशी ती ठेवणे आवश्यकही राहील. संरक्षण, चलन, दळणवळण व परराष्ट्र संबंध या चार विषयांमध्ये या महासंघाचे एकत्रित असे काही धोरण असेल. या सर्व देशांची आपसामध्ये युरोपियन महासंघातील देशांप्रमाणे सरमिसळ होऊ दिली पाहिजे. म्हणजे कुठेही जाऊन वास्तव्य करावे, कुठेही जाऊन उद्योग व्यवसाय करावा, कुठेही प्रवास करता यावा अशा प्रकारे या देशांमध्ये एक मोकळीकीचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. या मोकळीकीच्या वातावरणातून एक परस्पर विश्वासाची जाणीव निर्माण होईल व विश्वासाची जाणीव निर्माण झाली तरच या जनतेमधील एकसंधतेची जाणीव जागृत होईल. अखंड भारत हा राजकीय दृष्ट्या अखंड नव्हताच. तो सांस्कृतिक दृष्ट्या अखंड निश्चितपणे होता. ही सांस्कृतिक एकात्मता जपण्यासाठी आपल्याला योजनापूर्वक प्रयत्न करावे लागतील.
भारताचे सांस्कृतिक एकात्म हे वेदकाळापासून प्रस्थापित होत आलेले आहे. रामायण व महाभारत हे आजही या सर्व देशांना जोडणारे दुवे आहेत. या ठिकाणचा कर्म सिद्धांत, पुनर्जन्म संकल्पना, सर्व चराचर सृष्टी मध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे व त्यामुळे या भूमीचा प्रत्येक कण व कण पवित्र आहे ही जाणीव, आजही या सर्व भूप्रदेशातील जनतेमध्ये निश्चितपणे अस्तित्वात आहे. योग, संगीत, अध्यात्म, आयुर्वेद व कुटुंब व्यवस्था या पाच आधारांवर ही सांस्कृतिक एकात्मता साधण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागेल. अनेक महापुरुष हे भारतातून जगभरात ठिकठिकाणी गेले. त्यांनी शांततेचा व माणुसकीच्या व्यवहाराचा संदेश जगभरातील सर्व देशांना दिला. त्या महापुरुषांच्या बद्दलचाआदर हा या सर्व देशातील जनतेमध्ये निश्चितपणे आहे. नालंदा व तक्षशिला यासारखी विद्यापीठे,पाणिनी सारखे जागतिक कीर्तीचे विद्वान हा या दोन देशांमधील समान इतिहासाचा धागा आहे. जगभर शांततेचा संदेश घेऊन गेलेले लक्षावधी बौद्ध भिक्षू, मनू महर्षी, अगस्ती ऋषि ,कंबु व कौंडिण्य, यांच्या सारख्या सांस्कृतिक दूतांच्या आधारावर जनमानसातील एकात्मता साधणे शक्य आहे. या समान श्रद्धास्थानांचा उपयोग सर्व भूभागातील जनतेला जोडण्या साठी, त्यांची मने एकत्र आणण्यासाठी करावा लागेल. मध्ययुगात घडलेला संघर्षाचा इतिहास विसरण्यासाठी सेवा, समन्वय, शिक्षण, आरोग्य, रोजगार व संस्कार या सर्व क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचे उपक्रम यांची जोड द्यावी लागेल. हे सर्व घडून यायला वेळ निश्चित लागेल. परंतु ते घडणे अशक्य मात्र नाही. जनता जोपर्यंत जोडली जाणार नाही तोपर्यंत एकसंध राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणार नाही, व अखंड भारताचे स्वप्न वास्तवात येणार नाही.
प्रचंड मोठ्या मुस्लिम जनसंख्येमुळे अखंड भारत ही समस्या होणार नाही का ?
अखंड भारताचा विषय ज्या ज्या वेळी काढला जातो त्या त्यावेळी आपल्या देशातील विचारवंत पुन्हा एकदा फाळणीपूर्व परिस्थिती आठवण करून देतात. मुस्लिम समाज हा ठराविक संख्येच्या वर गेला की तो इतर समाजांचे सहअस्तित्व मान्य करत नाही. जिहाद ची घोषणा करून इतर सर्व समाजांना संपविण्यासाठी तो दंगलीचे राजकारण सुरू करतो. राजकारण्यांवर दबाव आणून मुस्लिम मुलतत्ववादाकडे झुकणारी धोरणे अमलात आणण्यास भाग पाडतो. हा केवळ भारतातलाच नव्हे तर जगभरातला इतिहास आहे. आज फ्रान्स व ब्रिटन सारख्या देशांमध्ये देखील हाच अनुभव येत आहे. परंतु त्याचबरोबर दुसराही एक विषय लक्षात घेतला पाहिजे. खुद्द मुस्लिम देशांमध्ये मुस्लिम समाज हा उपद्रवकारक ठरत नाही. चीन, रशिया यासारख्या देशांमध्ये तो दंगली घडवू शकत नाही. याचे कारण मुस्लिम जिहादी विस्तारवादापेक्षा प्रभावी असा राष्ट्रवाद त्या त्या देशांनी जोपासला आहे. कायद्याच्या चौकटीत चालणारे राज्य ही मर्यादा ओलांडून जेव्हा जेव्हा मुस्लिम समाज आक्रमक होऊ पाहतो, त्यावेळी ती कृती अतिशय कठोरपणे त्या ठिकाणी मोडून काढली जाते. सुरुवातीला भारतीय महासंघ निर्माण झाल्यानंतर या समस्या निश्चितपणे येतील. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारच्या हिंसात्मक कारवाया करण्याची संधी मिळणार नाही, तशा कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर त्या कठोरपणे मोडून काढल्या जातात हा एकदा अनुभव आला की मुस्लिम समाज हा मूळ राष्ट्रजीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, असाही जगभरातला इतिहास आहे. भारतातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी खात्री बाळगायला हरकत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी जवळ जवळ दर आठवड्याला भारतात कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होत होते. कुठे ना कुठे जातीय दंगली होत होत्या, व पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागत होते. नरेंद्र मोदी केंद्र सरकारमध्ये आल्यापासून या सर्व गोष्टी आपोआप नाहीशा झालेल्या आहेत. यामागचे गमक हेच आहे की हिंसाचार इथे खपवून घेतला जाणार नाही, अतिरेक्यांना योग्य ते शासन निश्चितपणे मिळेल, परंतु जे राष्ट्र जीवनाशी एकरूप होतील त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य व पुरस्कार मिळतील, असे वातावरण त्यांनी निर्माण केलेले आहे.
अखंड भारताचे अस्तित्व हे सांस्कृतिक आधारावरच टिकून राहू शकते. भारताची संस्कृतीहीच जगभरातील संघर्ष हिंसाचार व पिळवणुकीच्या वातावरणातून सर्वांना सुख समृद्धीकडे नेण्याचा मार्ग दाखवू शकते हे सर्व जगभरामध्ये आज मान्य केले जात आहे. भोगवादी विचारसरणीशी अधिक जवळीक साधणाऱ्या उपासना पद्धती व राजकीय विचारधारा या भारतामध्ये रुग्णाल नाहीत याचे कारण भारताची मूळ संस्कृती ही त्यागवादी संस्कृती आहे. या सांस्कृतिक आधारावरती जर समाज एकत्रितपणे उभा राहिला, तर कोणत्याही उपासना पद्धतीच्या पालनामुळे देशापासून वेगळे होण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता राहणार नाही. त्यामुळे धार्मिक उन्मादा पेक्षा राष्ट्रीय व सांस्कृतिक प्रेरणा अधिक प्रभावी राहाव्यात, यासाठी शैक्षणिक व सामाजिक , तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील विशेष प्रयत्न करावे लागतील. हे ज्यावेळी घडून येईल त्यावेळी राष्ट्रजीवन एकरस होत जाईल व महासंघापुरते एकत्रिकरण न राहता एक जिनसी राष्ट्र म्हणून आज ना उद्या हिंदुस्तान पुन्हा एकदा उदयाला आलेला दिसेल.
स्वप्न नव्हे वास्तव
आज तरी अखंड भारत हे एक स्वप्न आहे. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, एक राष्ट्र आहे व ते सांस्कृतिक पायावर उभे राहिलेले आहे, ही आपली धारणा निश्चित आहे. त्याच दिशेने प्रयत्न करत राहून आधी विद्यमान भारत समृद्ध व समर्थ राष्ट्र बनविणे व त्याच्या गुरुत्वाकर्षणातून इतर राष्ट्रसमूहांना जोडून घेऊन अखंड भारताची निर्मिती करणे ही आपल्या वाटचालीची दिशा असली पाहिजे. तसे घडले तरच या स्वप्नाचे रूपांतर वास्तवामध्ये झालेले दिसून येईल.